Friday, June 29, 2012

ईडा पिडा टळो भिमाचे राज्य येवो!


नेहमीप्रमाणेच या दिवाळीला सुद्धा मोबाईलवर मित्रांचे मेसेजेस आले. काही हिंदु मित्रांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. काही ज्येष्ठ विचारवंतांच्या शुभेच्छा आल्या. काहींनी दिवाळीच्या ऎवजी इडा पिडा टळे बळीचे राज्य येवओ अशा शुभेच्छा दिल्या होत्या. काही बौद्ध मित्रांनी दिवाळी हा मोदगल्यायन या बौद्ध भिक्खुचा याच दिवशी खून झाला होता म्हणून हा दिवस आनंदाचा नसून शोक दिन आहे असेही मेसेज पाठवले.
त्या सर्व मेसेज मधून माझे मन ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो!’ या मेसेज वरुन हटत हटेना डोक्यात बराच कोलाहलमाजला आणि विचारांची एक श्रुंखला निर्माण होत गेली. बळीचे काय करायचे असा प्रश्न समोर उभा ठाकला!
1937 सालचा प्रसंग! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विलायतेहून नुकतेच आगमण झाले होते. त्यांनी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या दौर्‍याचा कार्यक्रम निश्चित केला. आपल्या पहील्या फेरीत नाशिक जिल्ह्यातून दौरा करण्याचे निश्चित झाले. बाबासाहेबांचे आगमण जिथे तिथे असे तेथे तेथे पुढील घोषणा दिल्या जात होत्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार, आंबेडकर कौन है! दलितोंका राजा है। तरुण पार्टी झिंदाबाद। थोडे दिन मे भिमराज। सर्वच ठिकाणी स्वतंत्र मजूर पक्ष व डॉ.बाबासाहेब यांचा जयजयकार होत होता.
दिंडोरी येथे आल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकाराने दिंडोरी गाव गजबजून गेले. महारवाड्यात सुंदरशा मंडपात तयार केलेल्या मंचावर आरुढ होताच तेथील शेकडो स्त्रीयांनी आरती ओवाळून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भक्तीभावाने व भगिनीप्रमाणे ओवाळून ‘इडा-पिडा टळो! भिमाचे राज्य येवो!’ असे म्हणाल्या.
संपुर्ण प्रसंग आजच डोळ्यासमोर घडत आहे असेच वाटते. त्यातल्या दोन गोष्टींनी मला नेहमीच विचार करायला भाग पाडले आहे.
पहीली गोष्ट भिमराज येवो या घोषणेतून व्यक्त झाली आहे. डॉ.आंबेडकरांना सार्वजनिक आयुष्यात येऊन केवळ 10 वर्षे झाली होती. त्यातही राजकारणात फारच थोडी. तरीही 1927ला महाडच्या चवदार तळ्यावर सुरु केलेला सामाजिक समतेचा संघर्ष दलितांना विशेषत: महारांना जबरदस्त चैतन्य देऊन गेला. बाबासाहेबांनी मानवी हक्कांची सुरु केलेली लढाई महारांनी शिरसंवाद्य मानली व चळवळीसाठी तन मन धन सर्व काही दू केले. त्यामुळेच बाबासाहेब या देशामध्ये समग्र क्रांती करु शकतात असा विश्वास महारांमध्ये निर्माण झाला. त्या समग्र क्रांतीलाच त्या भोळ्या भाबड्या परंतु कट्टर निष्ठावंतानी ‘भीमराज’ नाव दिले.
दुसरी गोष्ट त्या शिलवान, निष्ठावान भगिनिंनी बाबासाहेबांना ओवाळताना ‘ईडा पिडा टळो! भिमाचे राज्य येवो!’ असे म्हंटले. त्या भगिनिंना त्या काळामध्ये म्हणजे 1937 मध्ये बळीचे राज्य येवो असे न म्हणता ‘भिमाचे राज्य येवो’ असा काळानुरुप बदल केला. केवढी मोठी निष्ठा! केवढे मोठे शहाणपण! केवढा मोठा विश्वास! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्ववत्तेवर, शीलावर, करुणेवर ज्यांची जीवापाड निष्ठा होती त्यांनी बळीला 1937 सालीच सोडले व बाबासाहेबांना तन-मन-धनाने स्वीकारले. ज्यांनी बाबासाहेबांच्या विचारविश्वाचा, आधुनिक भारताचा ध्यास घेतला, ज्यांनी नव्या राष्ट्राच्या निर्मितीचा ध्यास घेतला, ज्यांनी नव्या राष्ट्राच्या निर्मितीचा ध्यास घेतला त्या बाबासाहेबांच्या निष्ठावान अनुयायांनी 1937 सालीच बळीच्या राज्याला डॉ.बाबासाहेब आंबेड्कर प्रणीत नवराष्ट्र निर्माण हाच पर्याय आहे हे छातीठोकपणे सांगितले.
कारण बळीच्या राज्यात बहुजनांना सुखशांती असेलही. परंतु आता नव्या जमान्यात एकाधिकारशाही, राजेशाही, सामंतशाही म्हणजेच शोषण! हे संपवायचे असेल तर लोकसत्ताक रचनाच हवी. आम्हीच आमचे प्रवर्तक आम्हीच आमचे मालक!
शिवाय बळीने वामनापुढे शरणागती पत्करली. वामनाला म्हणे तीन पाय होते. त्यातला एक पाय आकाशात, दुसरा पाय पृथ्वीवर ठेवल्यानंतर तिसरा कुठे ठेवायचा हा प्रश्न पडला आणि बळीने आपली मान तुकवून आपले डोके वामनाच्या तिसर्‍या पायासाठी पुढे केले. यातील ब्राह्मणी कल्पनाविलास सोडला तर एक सत्य उरते! ते म्हणजे ब्राह्मणाच्या वेषात आलेल्या वामनाला बळी सर्वश्रेष्ठ मानतो. ब्राह्मणी व्यवस्थेला व ब्राह्मणी धर्माला शिरसंवाद्य माननारा बळी म्हणूनच वामनापुढे मान तुकवतो. हि शरणगमनता अचानक आलेली नाही. ब्राह्मणी संस्कृतीच्या प्रभावाखाली असल्यामुळेच बळी वामनला डोक्यावर घेतो आणि अखंड भारतवर्षाला व समस्त बहुजनांना ब्राह्मणाच्या हवाली करुन एका अंधारयुगाला प्रारंभ करतो. बहुजनांच्या कित्येक पिढ्यांनी रक्ताने, घामाने उभारलेले एक सुजलाम, सुफलाम राज्य आपल्या एका कृतीने एका क्षणांत बळीने ब्राह्मणाच्या हाती नव्हे तर पायी देऊ केले. हा भाबडेपणा म्हणावा की आणखी काही?
हे आजच्या विचारवंताना दिसत नाही असे नाही. तरीही ते ‘बळी बळी’ म्हणून टाहो फोडत आहेत. हे त्यांच्या अज्ञानातून घडत नसून हिंदुत्वाचे भिकार सनात तुणतुणे ज्यांना सोडवत नाही व आधुनिक राष्ट्र निर्मितीचा बाबासाहेबांचा आराखडा ज्यांना पचत नाही अशांनी बळीचे भूत बळेबळेच गळी मारुन बहुजनांना आंबेडकरी विचारधारेपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र खुद्द डॉ.बाबासाहेबांच्या  नावाचा जप करत सुरु ठेवले आहे. आंबेडकरी विचारमंथनातून स्वत: ही मुक्ती पावत नाहीत व बहुजनांनाही मुक्तीपासून दुरु ठेऊन त्यांच्या मनात गोंधळ उडवून देत असतात. हा सुनियोजित कट आहे असे आम्हांस वाटते.
आधुनिक भारताच्या रचनेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आराखडा संविधान समितीने व संसदेनेही स्वीकारला नाही. बाबासाहेबांनी प्रस्तुत केलेले मनुला संपविणारे व भारतीय स्त्रिचाही सन्मान वाढविणारे ‘हिंदु कोडबिल’ नेहरु व इतर सनतन्यांनी मान्य तर केले नाहीच उलट गायब केले आणि त्यापूर्वी संविधानामध्ये समग्र क्रांतीचे रसायन ओतायला याच सनातन्यांनी बाबासाहेबांना संविधानसभेमध्ये विरोध केला होता. शेवटी हेच क्रांतीचे रसायन ‘States & Minorities’ या नावाने स्वतंत्र ग्रंथाच्या रुपात बाबासाहेबांनी प्रकाशित केले आणि अशा क्रांतीकारी विचारधारेकडे पाठ फिरवून जे जे ‘बळी बळी’ असा जप करित आहेत त्या बळींच्या ध्यासाध्यायींना आम्ही शुभेच्छा तरी कशा द्यायच्या हा आमच्यासमोर प्रश्न उभा राहतो. अज्ञानात खितपत पडलेल्या व म्हणूनच त्यांचे जीवन नरकयातनांनी परिपूर्ण आहे अशा बहुजनांना समग्र क्रांतीचा मार्ग दाखविण्याऎवजी पुराणातल्या ब्राह्मणी व्यवस्थेला शरण जाणार्‍या बळीचे स्वप्न दाखवून किती दिवस हे ब्राह्मणग्रस्त छुपे हिंदुत्ववादी विचारवंत फसविणार आहेत?
याप्रसंगी ‘शुद्र पूर्वी कोण होते’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत बाबासाहेबांनी उल्लेख केलेल्या हिंदुच्या पाच प्रकारच्या वर्गांची आठवण होते. पुष्कळ वर्षे आम्ही ज्यांना पुरोगामी समजलो ते तथाकथित विचारवंत असे फुसकेच राहतील असे वाटले नव्हते.
शेवटी ईडा पिडा टळो या बहुजनांच्या सार्वजनिक शुभसंदेशाकडे वळुयात! ईडा या शब्दाचा अर्थ मराठी भाषेमध्ये सापडत नाही. ‘ईडा’ हा द्राविडी शब्दप्रयोग आहे. आजही तो तामिळ भाषेत प्रचलित आहे. ईडा चे तामिळ भाषेत दोन अर्थ आहे. एक म्हणजे ‘घास’! अन्नग्रहण करताना अन्नाचा एक अंश जो आपण तोंडात घालतो तो घास म्हणजे ईडा. म्हणजे ईडा हा अन्नासंबधी अन्नदर्शक शब्द आहे.
ईडा या शब्दाचा दुसरा अर्थ आहे हिरवागार भुप्रदेश. म्हणजे सुपिकता, सुजलाम, सुफलाम अशा अर्थाचा भावदर्शक शब्द आहे. तो कृषिप्रधानताही दर्शवतो. ‘पीडा’ म्हणजे दु:ख, यातना! ‘पिडा’ला पाली भाषेमध्ये पीळा म्हणतात. जसे पीडा व पीळा एकच होतात तद्वतच ईडेचा ईळा होत असावे.
ईडा पीडा हे शब्दप्रयोग द्राविडांचे द्रविडीभाषेचे दक्षिनायन झालेल्यानांही किंवा उत्तर भारतातून अनेक परकीय राजसत्तांच्या आक्रमणामुळे द्राविडींचे उच्चाटन झाल्यानंतरही महाराष्ट्रामध्ये द्राविडीचा थोडाफार अवषेश अजुनही बाकी आहे.
‘ईडा पीडा टळो’ याचा अर्थ अन्न देणार्‍या हिरव्यागार भुप्रदेशावर येत असलेली पीडा नष्ट होवो. मुबलक अन्न मिळो अन्न धान्य पिको सुख समृद्धी येवो व सर्व सुखी होवोत असा होतो. आधुनिक भारतामध्ये ही समृद्धी येऊन देश खर्‍या अर्थाने जागतिक महासत्ता बनायचा असेल तर संविधानाने पुरस्कृत केलेल्या जीवन मुल्यांचा स्वीकार प्रत्येक भारतीयाला करावाच लागेल.
संविधान पुरस्कृत न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हिच अस्मिता व्हायला हवी. मराठी, बिहारी, तमिळ, भैया, काश्मिरी, बोडो अशा फुटकळ अस्मिता कामाच्या नाहीत. त्याकाही जणांना काहीकाळ सत्तासुख देतील पण हाती सत्ता असताना आंबेडकरी आराखड्याप्रमाणे देशाच्या किंवा राज्याचा विकास घडवून आणला नाही तर बहुजन कल्याणकारी राज्याची सुतराम शक्यता नाही. उलट अशा छद्मी अस्मितेमुळे माणसामाणसातून दरी रुंदावली जाते.  शेवटी कधी प्रांताच्या नावाने तर कधी भाषेच्या पोकळ अभिमानाने दंगली घडविल्या जातात. दंगली, विध्वंस यांच्या अराजकातून काही व्यक्तींचे भवितव्य जरुर घडेल परंतु देशाचे भवितव्य मात्र जेव्हा अशा खुजा लोकांच्या हाती सत्ता जाते त्याची किंमत शांततापुर्ण विकासाची वाट पाहत असलेल्या लोकांना मोजावी लागते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ठणकावून सांगतात, ‘मी प्रथमही भारतीय आहे आणि नंतरही भारतीयच आहे’. अशा प्रकारची उत्तुंग मानसिकता प्रत्येक भारतीयाच्या अंगात कोरली जाईल त्यादिवशी देश खर्‍या अर्थाने नवनिर्माणाच्या मार्गाने कुच करील. जातीविरहीत व वर्गविरहीत समाजाची रचना करणे हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संकल्प आहे. संसदिय लोकशाही बाबासाहेबांना सर्वात योग्य वाटते. व्यक्ती, समाज व राष्ट्र यांचा एकसंघ विकास या दृष्टीने त्यांनी संविधान दिले व विचारधारा मांडली. खरे तर बाबासाहेबांचा या विचारधारेला आणि सम्यक संकल्पाला नाकारायची कुणालाच कसल्याही प्रकारची गरज वाटू नये परंतु जेव्हा बहुजन विचारवंत ही आंबेडकर नावाच्या क्रांतीला नकार देतात तेव्हा नाकारणार्‍यांच्या बाबत शंका उपस्थित होणे साहजिकच होय. ‘बळी’ व ‘वामन’ हि मोठी समस्या नाही परंतु त्यांच्यात अडकलेली मानसिकता हिच मोठी धोंड होय.
--- प्रा. प्रेमरत्न चौकेकर 

Tuesday, June 19, 2012

नरके यांनी आंबेडकरी जनतेची जाहीर माफी मागावी!


महार कोण होते? उदगम: संक्रमण: झेप या नावाचे पुस्तक संजय सोनवणी यांनी बाजारात आणले आहे. या पुस्तकाच्या खपासाठी प्रमोशन प्रोग्राम घेतले जात आहेत. या कार्यक्रमाचे प्रायोजक समाज शिक्षण अभियान ही पावसाळी छत्री करत आहे. या संस्थेचे सर्वेसर्वा शुद्धोधन आहेर, प्रा. विजय मोहिते ईत्यादी आहेत.
या कंपुने पहिला प्रमोशनल कार्यक्रम डॉ.आंबेडकर भवन, दादर येथे घेतला. या कार्यक्रमाला खुद्द लेखक संजय सोनवणी व पंडीत हरी नरके उपस्थित होते. हा कार्यक्रम 24 फेब्रुवारी रोजी झाला. 5 मार्च रोजी हाच कार्यक्रम दैवज्ञ हॉल, वाशी, नवी मुंबई येथे त्याच यशस्वी कलाकारांच्या उपस्थितीत घेतला गेला.
नरके यांनी आंबेडकर भवन येथे आपल्या भाषणात आरोप केला की, आंबेडकरवादी हे मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सुपार्‍या घेत आहेत. या गंभीर आरोपाबाबत या अविवेकी वाचाळ माणसाने आपल्या या मुर्खपणाबद्दल आंबेडकरी जनतेची जाहीर माफी मागायला हवी. त्यांनी कुणावर व्यक्तीगत आरोप केला असता तर गोष्ट वेगळी होती. पण सरसकट सर्व आंबेडकरवाद्यांना त्यांनी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले हा कोणता शहाणपणा? यामुळेच त्यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागावी अशी समस्त आंबेडकरवाद्यांची मागणी आहे.
वाशी येथील दैवज्ञ भवनात झालेल्या प्रमोशनल कार्यक्रमामध्ये तर नरके नरक ओकले. नरकेंच्या भाषणाच्या सुरुवातीलाच एका बौद्ध बांधवाने महार कोण होते? असे या पुस्तकाचे नाव का ठेवले? पुन्हा पुन्हा महार या शब्दाचा वापर का करता? महार आणि बौद्ध हा वाद निर्माण का करता? वगैरे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु नरके यांनी त्यांना सज्जड दम भरत त्यांना खाली बसायला लावले.  त्यावर बोलताना नरके म्हणाले, हे पुस्तक बौद्धांसाठी लिहीलेले नाही आणि मंचावरील कंपुने टाळ्या वाजवल्या. खरे तर लेखक संजय सोनवणी यांनी आपल्या पुस्तकात हे पुस्तक बौद्धांसाठी नाही असे कुठेही म्हंटलेले नाही. उलट एकूनच पुस्तक वाचल्यानंतर असे स्पष्ट जाणवते की हे पुस्तक केवळ बौद्धांसाठीच लिहिले आहे. आज हे जाहीर आहे की गेली 50 वर्षांपासून तरी बौद्ध समाजच परिवर्तनकारी पुस्तके वाचतो आणि खरेदी करतो. त्यामुळे ज्याला आपल्या पुस्तकाचा खर्च भरुन काढायचा असतो आणि वर कमाई करायची असते त्याने खुशाल बौद्धांमध्ये पुस्तके आणून वितरीत करावीत ह निश्चित झालेले आहे.
या पुस्तक रुपाने आंबेडकरी समाजात महार व बौद्ध अशी दुही माजविणे हा या पुस्तकाचा, नरके व त्यांच्या कंपुचा छुपा अजेंडा दिसुन येतो. असा हिणकस प्रयत्न या आधीही झाला होता. शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांनी बौद्धेतर दलितांना हिंदु दलित असे म्हणून त्यांचा वेगळा मेळावाही लावला होता चर्मकार, मातंग ढोर, ईत्यादी उमेदवारांना निवडणूकांमध्ये तिकीटे देऊन निवडूनही आणलेले आहे. बौद्धांपासून इतर दलितांना तोडण्यासाठी सर्वच प्रस्थापित वेगवेगळ्या प्रयुक्त्या वापरीत असतात. त्यात आता नरके आणि कंपुची भर पडली आहे. आंबेडकरवाद्यांवर सुपारीचा आरोप करणार्‍या या कंपुने स्वत: कुणाची सुपारी घेतली आहे की काय असे वाटण्या इतपत त्यांचे वर्तन बेताल होत आहे.
त्यानिमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, ओबीसींच्या आरक्षणाविषयी पूर्वाश्रमीच्या महारांना रस्त्यावर उतरविण्यासाठी नरके खटाटोप करीत आहेत. मराठा सेवा संघाचे व शिवधर्माचे पुरषोत्तम खेडेकर यांच्यावर टीका करताना खेडेकरांच्या एका पुस्तकातील ब्राह्मण स्त्रीयाविषयी अतिशय नीचांक गाठणारे लेखक वाचून दाखवितात. खेडेकरांनी आपल्या पत्नीला बीजेपीच्या तिकीटावर निवडणूक लढवून आमदार केले. मराठा हे सर्व सत्ता गिळंकृत करीत आहेत. मराठे ओपन सीट मधून निवडून येतातच. परंतु त्यांची भुक आणखी वाढली आहे. त्यामुळे ओबीसीच्या जातप्रमाणपत्रावर आता ओबीसी कोट्यातूनही ते निवडणूका लढवितात. इतर सवलती लाटत आहेत. आणि अशा मराठ्यांना बामसेफचे वामन मेश्राम मदत करीत आहेत, सुपार्‍या घेत आहेत असे गंभीर आरोप नरके यांनी केले. अर्थात या आरोपांचे उत्तर खेडेकर आणि मेश्राम देतीलच!
आपली भाषणबाजी पुढे रेटताना नरके पुढे म्हणतात, तुम्ही बौद्ध लोक 1 जानेवारीला भीमा कोरेगांवला का जाता? तुमची नक्की अस्मिता कुठली? महार की बौद्? तुमचा काय संबंध? असे विचारुन ते पुढे असेही म्हणतात कि, महारांनी भीमा कोरेगांवचा लढा लढून पेशवाईचा अंत केला असला, त्याप्रसंगी नेतृत्व जरी केले असले व बहुसंख्येने महार असले तरी एखादा माळी, एखादा चर्मकार, मातंग, कुणबी इत्यादि जातीतील सैनिकही प्राण पणाला लावून लढले त्यांचा विसर पडता कामा नये.
इथे एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की, पुर्वाश्रमीचे महार आजचे बौद्ध केवळ महार योद्धांना सलामी द्यायला जातात असा नरकेंचा समज असावा. एवढ्या कोत्या बुद्धीचे बौद्धजन नाहीत हे नरकेंना भांडारकर इंस्टीट्युटमध्ये बसून पोथ्यापुराणात सापडणार नाही. हे कळण्यासाठी अर्थातच सच्चा दिलाने बौद्धमय व्हायला लागेल.
आम्ही या प्रसंगी असे विचारतो की तुम्हाला आणि एकुणच पुर्वाश्रमीच्या महारांना सोडून इतर समाजाला भीमा कोरेगांव येथे जायला कोणी प्रतिबंध केला आहे? आता तरी तेथे जा! लाखो कोटींच्या संख्येने जा. आणि ब्राह्मणीधर्म संपविण्याच्या जिद्दीने धारातिर्थी पडलेल्या तुमच्या पुर्वजाची जाऊन तेथे माफी मागा आणि म्हणा की, आम्ही नालायक आहोत तुम्हाला गेली शंभर वर्षे ओळखु शकलो नाही. तुमच्या शौर्यासमोर नतमस्तक झालो नाही याची आम्हाला लाज वाटते आहे. अशा प्रकारे नरकेंनी भीमा कोरेगांवला जाऊन एकदा तरी मनापासून गुढगे टेकले तरी ते धन्य होतील.
ओबीसींच्या आरक्षणाबाबत ओबीसी स्वत: संवेदनशील नाहीत आणि गंभीर ही नाहीत. परंतु आंबेडकरवादि पूर्णत: ग्ंभीर आहेत. आज ओबीसी ब्राह्मणी गुलामगिरीच्या कच्याट्यात पूर्णत: अडकला आहे. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजईय संपुर्णपणे तो ब्राह्मणी तंबूतच आहे. याची कल्पना आंबेडकरवाद्यांना आहे. म्हणूणच त्यांच्या रक्षाणी आणि आरक्षणाची जबाबदारी आंबेडकरी समाज घेत आहेत. सातत्याने ब्राह्मणी व्यवस्थेच्या समर्थकांसोबत राहून दलितांवर अत्याचार करण्यामागे ओबीसी पुढे असूनही बुद्धाच्या करुणेने, समता भावनेने, मैत्री भावनेने ओबीसींसाठी आंबेडकरी समाज प्रयत्नशील आहे. बौद्धांनी 55 वर्षात काय केले या प्रश्नाचे उत्तर अर्थातच भांडारकर इंस्टीट्युटच्या पोथ्या पुराणातून मिळणार नाही.
मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात नरके गळा काढत आहेत. मंडल आयोगाअंतर्गत हिमाचल प्रदेश व हरियाणा या दोन राज्यात ब्राह्मणांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळाले. तेव्हा नरकेंना वाईट वाटले नाही. परंतु आज मराठा समाज आरक्षण मागत आहे तर त्याविरुद्ध नरके बरळत आहेत. याबाबत मागासवर्गीय कोण हे ठरविण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जावा व त्या त्या वेळी जे मागास असतील त्यांच्या उत्थानासाठी शासनाने योग्य धोरण आखावे व उपाय योजावेत असे संविधान म्हणते.
त्यामताशी आंबेडकरवादी पुर्ण सहमत आहेत. त्याला विरोध असण्याचे कारण काय? आरक्षण हे मागासांच्या उत्थानासाठी एक सांविधानिक साधन आहे हे खरे आहे. परंतु 52% असलेल्या ओबीसीना आपल्या उत्थानासाठी कुणाची गरज नाही. मात्र स्वत:ला गुलाम करणार्‍या व्यवस्थेशी जो पर्यंत दोन हात करायची तयारी नाही तोपर्यंत ओबीसींची मुक्ती वा स्वातंत्र्य शक्य नाही. आता नरके आणि तत्सम विद्द्वान जर खरेच गंभीर असतील तर ओबीसी समाजाला जागृत करायचे काम पूर्ण ताकदीनीशी करावे. तरच या देशाचे भवितव्य बदलेल. ओबीसीच्या वैचारीक, सास्कृत्तीक सामाजिक, धार्मिक, राजकीय प्रबोधनाशिवाय व संघर्षाशिवाय देशाचे राष्ट्रीयत्व सुरक्षित राहणार नाही. एवढी प्रचंड जबाबदारी नरकेसारख्या लोकांवर आहे. महार कोण होते हे महारांना सांगुन काहीच फरक पडणार नाही. सोनवणींच्या पुस्तकात महार रक्षक होते असे म्हंटले आहे. डो. बाबासाहेब आंबेडकरांनी महार हे राज्यकर्ते होते हे सिद्ध केले आहे. तरीही संजय सोनवणींचा खोडसाळपणा आंबेड्करी समाजाच्या डोक्यावर मारण्यात नरकेंना विकृत आनंद मिळाला तरी ओबीसीच्या स्वातंत्र्यलढ्याची जबाबदारी ते स्वत:, सोनवणी व इतर ओबीसी अभ्यासक टाळू शकत नाही. लेखक संजय सोनवणी म्हणतात तसे बाबासाहेबांना कुणीही जातीमध्ये बंद केलेले नाही. आंबेडकरी विचारधारा बंदिस्त केलेली नाही. संजय सोनवणी त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, नरके हे डॉ. आंबेडकरांवरील एकमेव ऑथॅरीटी आहेत. मग रडता कशाला? व्हा सज्ज! जा ओबीसींमध्ये! सांगा त्यांना आंबेडकरवाद म्हणजे काय? ठरवा रणनिती! करा जागृती! हिंम्मत असेल तर करुन दाखवा! परंतु आंबेडकरवाद्यांना दोष देणे बंद करा, नाहीतर तुमचे दात तुमच्या घशात घालण्यास आंबेडकरवादि तयार आहेतच.
(ओबीसींचे प्रबोधन तरी पैसे न घेता करा ही नम्र विनंती)


रिपब्लिकन जनता (मार्च-2012) मासिकातून साभार!