Wednesday, December 28, 2011

मी रिपब्लिकन का आहे? (भाग-2)

संसदीय लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक गोष्टी.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीची व्याख्या पुढील प्रमाणे करतात. 
"लोकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात रक्तविरहीत मार्गांनी क्रांतीकारक बदल घडउन आणणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही." 
    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असणा-या गोष्टींबाबत सविस्तर चर्चा केली आहे. 
  1.   1. समाज व्यवस्थेत विषमता नसली पाहीजे.
    पिडीत, दडपलेला वर्ग समाजात असता कामा नये. सर्व हक्क व सत्तेचे केंद्रिकरण ज्यांच्या ठायी झाले आहे असा वर्ग एका बाजूला व सर्व प्रकारचे भार वाहण्याचे काम करणारा वर्ग दुसर्‍याबाजूला अशी विभागणी असू नये. अशी विषमता, अशी अन्यायकारक विभागणी व त्यावर आधारलेली समाज रचना यामध्ये हिंसात्मक क्रांतीची बीजे असतात आणि मग त्यांचे परिमार्जन करणे लोकशाहीला अशक्य होते.

    लोकशाहीमध्ये दलित, पिडीत, ज्यांचे हक्क हिसकावून घेतलेले असतात असे जे भारवाहक बनलेले असतात ते लोक आणि ज्यांनी सर्व हक्कांचा समुच्चय स्वत:पाशी केलेला असतो असे लोक या दोहोंनाही मतदानाचा समान हक्क प्राप्त होतो. मातब्बर प्रस्थापित वर्ग हा बहुधा पिडीत वर्गापेक्षा संख्येने कमी असतो आणि निर्णय घेण्याच्या कामी आपण बहुमतांचे तत्व मान्य करित असल्याने जर या सुरक्षित प्रस्थापित वर्गाने सुखा-सुखी व स्वेच्छेने आपले विषेश अधिकार सोडले नाहीत तर मग त्यांच्या व खालच्या वर्गामधील अंतर दुरावेल. हे अंतर लोकशाहीच्या नाशास व एखाद्या भलत्याच राज्यपद्धतीला जन्म देण्यास कारणीभूत होईल. आणि म्हणूनच मी असे नि:संकोचपणे म्हणतो की, जगातील निरनिराळ्या भागातील लोकशाहीच्या ईतिहासाचा अभ्यास केल्यास, लोकशाहीच्या अपयशाचे कारण सामाजिक विषमता, वर्गावर्गात उभी असलेली असमतेची दरी हेच आहे असे दिसून येईल.
  1. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असलेली दुसरी गोष्ट म्हणजे विरोधी पक्षाचे अस्तित्व.
    सत्तेवरील नियंत्रण म्हणजे लोकशाही. वंशपरंपरागत सत्ता व सरंजामदारशाही याच्या नेमका उलट अर्थाचा शब्द म्हणजे लोकशाही. लोकशाहीचा अर्थच हा की, सत्तारुढ मंडळीच्या अमर्याद सत्तेला कोणीतरी केलेले नियंत्रण. परंतु दर पाच वर्षानी फक्त एकदा लोकमताचा कौल घेण्याच्या आधी मधल्या काळात अनियंत्रीत सत्ता वापरण्याच्या या पंचवार्षिक नियंत्रणामुळे खरी-खुरी लोकशाही येत नाही. लोकशाहीमध्ये राजसत्तेवर लोकमताचे नियंत्रण नुसतेच हवे असे नाही तर ते तत्काळ व सतत असावयास हवे. लोकसभेमध्ये सरकारला तेथल्या तेथे अडविणारे व आव्हान देणारे लोक असावे लागतात.

    लोकशाहीमध्ये कुणालाही अविरतपणे सत्ता गाजविण्याचा अधिकार नाही; परंतु शासनसंस्था ही लोकमतांनुवर्ती असावयास हवी आणि आणि तीला अडविणारे, आव्हान देणारे लोक खुद्ध सभागृहात असले पाहिजेत. विरोधी पक्षाच्या अस्तित्वामुळे सत्तारुढ सरकारचे ध्येयधोरण तापउन, ऐरणीवर ठोकुन नीटनेटके करण्याची व्यवस्था असते. सत्ताधारी पक्षाला आपल्या धोरणाचे व राजकारभाराचे समर्थन आणि त्या पक्षात बसलेल्या लोकांच्या शंकांचे निरसन सततपणे करावे लागते.

    आपल्या देशातील बहुतेक वर्तमानपत्रे सरकारी जाहिरातीच्या उत्पनांसाठी म्हणा किंवा अन्य कारणांसाठी म्हणा, सरकारी पक्षाला जास्त उचलुन धरतात, विरोधी पक्षाला प्रसिद्धी देत नाहित. आणि म्हणुनच लोकशाही यशस्वी होण्यासाठी विरोधी पक्षाची आवश्यकता आहे.
  1. लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक असलेली तीसरी बाब म्हणजे वैधानिक व प्रशासनिक विषयक क्षेत्रात समता पाळली गेली पाहिजे.
    कायद्यासमोर सगळे समान असायला हवेत अर्थात राज्यकारभार करताना पाळावयाची समता-दृष्टी ही चीज जास्त महत्वाची झाली.आहे.  प्रशासकीय सेवा कायम स्वरुपाच्या असतात. त्यातील नोकरवर्ग कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी कारभार चालवितो आणि मंत्रीमंडळही त्यांच्या कामकाजात हस्तक्षेत करित नाही. अश्या प्रकारची आपल्या देशात ब्रिटीश लोक असताना अवलंबली होती.सरकारने कारभार विषयक कामात हस्तक्षेप करू नये. सरकारचे काम हे धोरण ठरविण्याचे आहे,हस्तक्षेप किंवा पक्षपात करण्याचे नाही.
  1. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असणारी चौथी गोष्ट म्हणजे संविधानिक नीतीचे पालन होय.
    आपले आजचे संविधान हे कायदेशीर तरतुदींचा व तत्वांचा केवळ सांगडा आहे. ह्या सांगाड्याला आवश्यक असलेले रक्तमांस संविधानात्मक नीतीमत्तेच्या पालनातच मिळेल. तात्पुरत्या सत्तेच्या विलोभनास बळी पडुन पक्ष नेत्यांनी आपल्या  विरोधकांस, मग ते सत्तेवर असोत किंवा विरोधी पक्ष म्हणुन काम करित असोत, कैचीत पकडण्याचे प्रसंग संविधानाची व लोकशाहीची हानी होउ नये म्हणुन कटाक्षाने टाळले पाहिजे.
  1. लोकशाहीच्या नावाखाली अल्पसंख्यांकांची गळचेपी बहुमत वाल्यांकडुन होता कामा नये.
    अल्पसंख्यकांना नेहमी सुरक्षितता वाटली पाहिजे; बहुसंख्यांक मंडळी कारभार करीत असली तरी आपल्याला ईजा पोहचणार नाही, आपल्यावर अन्याय होणार नाही यांची हमी अल्पसंख्यकांना मिळाली पाहिजे.
सात्यताने तहकुबी सुचना मांडणे हे काही चांगले लक्षण नाही.छोट्या अल्पसंख्य जमातींच्या 4/6 सभासदांच्या गटाने उपस्थित केलेल्या तहकुबी सुचनांना जर सरकारी पक्षाकडुन सतत विरोध झाल्यास ह्या अल्पसंख्य लोकांना आपल्या दुखा:ना वाचा फोडायला संधी मिळणार नाही. अश्या परिस्थीतीत ह्या अल्पसंख्यकांत बेसनदशीर मार्ग अवलंबीण्याच क्रांतीकारक उठाव करण्याचे वारे मग निसर्गत:च शिरते. आणि म्हणुनच लोकशाही कारभारात बहुमत वाल्यांकडुन असे दडपशाहीचे वर्तन कदापी होता कामा नये.
  1. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी नीतीमान समाज व्यवस्थेची आवश्यकता आहे.
    नीतीशास्त्र हे राज्यशास्त्राहून काहीतरी अलग आहे असे मानन्यात येते. नीतीमत्ते शिवाय राजकारण करता येते या समजुतीने राजकारणाचा अभ्यास करणार्‍याला नीतीशास्त्राचा गंध नसला तरी चालेल असा प्रवाद आहे. माझ्या मते हा प्रवाद महाभयंकर व गंभीर आहे.

    लोकशाही म्हणजे स्वतंत्र सरकार असे संबोधण्यात येते. स्वतंत्र सरकार म्हणजे ती राज्यपद्धती कि, जिच्यामधे जास्तीत सामाजिक क्षेत्रात लोकांना कायद्याच्या हस्तक्षेपाशिवाय मोकळपणाने जीवन जगा आणि कायद्या करण्याचा आवश्यकता वाटलीच तर तसला कायदा पाळला जाण्या ईतपत सामाजिक नीतीमत्ता समाजामध्ये निर्माण झाली असल्याची खात्री कायदे करणा-यांना मिळाली पाहिजे. प्रा.लास्की त्यांच्या एका ग्रंथात म्हणतात "लोकशाही राज्यपद्धतीमध्ये समिष्टीतील नीतिमान जीवन गृहित धरलेले असते.सामाजिक नीतीमत्ते अभावी लोकशाही यशस्वी होउ शकत नाही, ती छीन्न-विछीन्न होईल.
  1. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी विवेकी लोकमनाची आवश्यकता असते.
    प्रत्येक देशात अन्याय होत असतात याबद्द्ल शंका नाही. समाजातील काही लोकांना अन्यायाची अगदीच थोडी झळ बसते तर काहींना अनन्वीत छळ सोसावा लागतो. ते अन्यायाच्या ओझ्याखाली दडपुन गेलेले असतात.

    समाजातील सार्वजनिक विवेकबुद्धी जागृत असायला हवी. अन्याय कोणावरही होत असो, अन्याय दिसला रे दिसला की जागृत होउन उठणारी शक्ती म्हणजे समष्टीची सद्सद्विवेक बुद्धी, सार्वजनिक विवेक बुद्धी याचा अर्थच असा की , जिच्या प्रादुर्भावामुळे समाजातील प्रत्येक माणुस मग तो अत्याचाराचा बळी असो वा नसो, अन्यायाच्या परिमार्जनार्थ पिडीतांना साथ द्यायला उभा राहतो.अल्पसंख्यकांवर होणा-या अन्यायांचा मुकाबला करण्यासाठी जर ईतर लोक पुढे आले नाहीत तर मग पुन्हा क्रांतीचे वारे अल्पसंख्यकांच्या डोक्यात खेळु लागते.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात "वरिल विवेचन म्हणजे राजकिय तत्वांची ठोकळेबाज जंगी नव्हे, परंतु निरनिराळ्या देशांचा राज्किय ईतिहास वाचल्यामुळे माझ्या मनावर बिंबलेल्या गोष्टींची ती अनुभूती आहे.आपल्याला स्वातत्र्य मिळाले आहे. ब्रिटीश चालते झाले आहेत. लोकशाहीचा पुकारा करणारी राज्यघटना आपण निर्माण केली आहे. तेव्हा आपल्याला याबाबतीत आणखी काय हवे आहे? आपण आता निश्चिंत बसुया, असल्या प्रकारची भावना या देशातील लोकांत बळावत आहे. राज्यघटना तयार केली म्हणजे आपले काम संपले ह्या प्रकारच्या आत्मघातकी भावनेच्याबाबत मी सर्वाना धोक्याचा ईशारा देउ ईच्छीतो. आपले काम आताशी कुठे सुरु झाले आहे".

प्रा.प्रेमरत्न चौकेकर 
मोबाईल: 9757088520

2 comments: